Thursday, 30 July 2026

प्रयोगशील शिक्षकांचे गावकऱ्यांकडून कौतुक

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राघुचीवाडी या शाळेत प्रयोगशील कार्य केलेल्या उपक्रमशील शिक्षिका श्रीमती रुक्मिणी बारकुल या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. तसेच या शाळेतील प्रयोगशील शिक्षक श्री. योगेश कपाळे यांची बदली झाल्यामुळे त्यांना कृतज्ञतापूर्वक निरोप देण्यात येत आहे. या दोघांच्याही सत्काराचा कार्यक्रम  उद्या शाळेत संपन्न होत आहे. त्यानिमित्ताने......

श्रीमती रुक्मिणी बारकुल व श्री. योगेश कपाळे यांनी पदवीधर शिक्षक म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राघुचीवाडी या शाळेत उत्कृष्ट कार्य केले. मुलांना गुणवत्तापुर्ण व दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेत सहशालेय उपक्रमांच्या आयोजन केले. शाळेच्या भौतिक सुविधांमध्ये वाढ व्हावी, शाळा समृद्ध व्हावी यासाठी लोकसहभाग मिळविण्यासाठी प्रयत्न केला. 

श्रीमती रुक्मिणी बारकुल व श्री. योगेश कपाळे यांनी समर्पित वृत्तीने शाळेच्या विकासासाठी सदैव पुढाकार घेतला. श्रीमती रुक्मिणी बारकुल यांनी समाजशास्त्र या विषयाचे अध्यापन करताना विद्यार्थ्यांना सर्जनशील अध्ययन अनुभव दिले. त्यांनी सदैव विद्यार्थ्यांच्या हिताचा ध्यास घेतला होता.

श्री. योगेश कपाळे हे अत्यंत मनमिळावू स्वभावाचे प्रयोगशील शिक्षक आहेत. त्यांचे शाळेच्या विकासात खूप मोठे योगदान आहे. शाळेसाठी समर्पित वतीने काम करत त्यांनी मुलांना घडविण्यासाठी नाविन्यपूर्ण प्रकल्प, उपक्रम राबविले. सहशालेय उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, कला क्रीडा विषयातील विविध उपक्रम त्यांनी शाळेत राबविले. श्री. योगेश कपाळे हे तंत्रस्नेही शिक्षक असून तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांनी विद्यार्थ्यांना अध्ययन अनुभव दिले. शाळा भौतिक सुविधांनी समृद्ध करण्यासाठी पालकांना प्रेरित केले. श्री.योगेश कपाळे हे एक उपक्रमशील शिक्षक, व चांगले मित्र म्हणून मला माझ्या सदैव स्मरणात राहतील. या दोघांनाही त्यांच्या पुढील कार्यासाठी भरभरून शुभेच्छा.

Thursday, 23 July 2026

जवाहर बालभवन येथे शिक्षण संवाद कार्यशाळा संपन्न

शालेय शिक्षण मंत्री मा.ना.श्री. दादाजी भुसे यांच्या संकल्पनेतून जवाहर बालभवन, मुंबई येथे शिक्षण संवाद ही कार्यशाळा २२ जुलै रोजी संपन्न झाली. या कार्यशाळेला मा.आयुक्त (शिक्षण), मा.शिक्षण संचालक, शालेय शिक्षण विभागातील अधिकारी,शिक्षण अभ्यासक, शिक्षणतज्ञ, प्रयोगशील शिक्षक, कला, क्रीडा विषयातील तज्ञ व्यक्ती उपस्थित होते. या कार्यशाळेला आदरणीय मंत्रिमहोदयांनी प्रेरणादायी व उर्जस्वल मार्गदर्शन केले.

अध्ययन अध्यापनातील प्रयोग आणि गुणवत्ता संवर्धन, शालेय स्तरावर कला, क्रीडा, अभिनव उपक्रम, शालेय स्तरावर सैनिकी शिक्षणाची प्रभावी अंमलबजावणी अशा विविध विषयांवर विचार मंथन झाले. जागतिक कीर्तीचे प्रयोगशील शिक्षक आदरणीय दत्ता वारे सरांनी शाळा विकासाच्या अनुषंगाने महत्त्वाचे मुद्दे मांडले. स्वयंप्रेरित शिक्षक, शिक्षण पद्धती, शालेय परिसर, शालेय संस्कृती या बाबी शाळा विकासासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले. कला,क्रीडा, साहित्य, संरक्षण या क्षेत्रातील मान्यवरांना ऐकता आले. राज्यातील प्रयोगशील अधिकारी व शिक्षक यांच्या भेटी झाल्या. एकमेकांचे रचनात्मक कार्य समजून घेता आले. शालेय शिक्षण विभागाने कार्यशाळेचे उत्कृष्ट नियोजन केलेले होते.


Monday, 6 July 2026

कौस्तुभची अभिव्यक्ती

कौस्तुभने गेल्यावर्षी झालेला हा निबंध. त्याच्या गेल्या वर्षाच्या जुन्या वह्या पाहताना हा निबंध दिसला. यावर्षी तो पाचवीला आहे. त्याने निबंधातून व्यक्त केलेल्या भावना, विचार मला खूप आवडले. शुद्धलेखनाच्या काही चुका आहेत; परंतु त्याने व्यक्त केलेल्या भावना महत्त्वाच्या वाटतात. 

Wednesday, 27 May 2026

पुस्तक भेट

काल माननीय जिल्हाधिकारी पुजार यांची भेट घेतली. त्यांना माझे मुलांना वाचतं लिहितं करताना हे पुस्तक भेट दिले. त्यांनी पुस्तकावर छान चर्चा केली. पुस्तकाचे कौतुक केले. पुस्तक लिहिण्याच्या प्रक्रियेबद्दल विचारले. पुस्तक नक्की वाचतो. वाचून प्रतिक्रिया ही देतो असे म्हणाले. 

त्याचबरोबर मराठी भाषा समितीच्या पुढील शैक्षणिक वर्षातील कामकाजाबाबत चर्चा झाली. धाराशिव जिल्ह्यातील ग्रामीण बोलीतील शब्दांचा शब्दकोश तयार करणे, इयत्ता दहावी च्या विद्यार्थ्यांचा मराठी विषयाचा निकाल वाढविणे, प्रशासकीय व्यवहारात मराठी भाषेचा प्रभावीपणे वापर करणे, मराठी भाषेच्या संवर्धनासाठी विविध उपक्रम घेणे या विषयावर सविस्तर चर्चा झाली. 
माननीय जिल्हाधिकारी यांना मुलांना वाचतं लिहितं करताना हे पुस्तक भेट दिले.

Friday, 9 May 2025

सर्जनशीलतेची रुजवात

 

लेखन म्हणजे मनातील भावना,मत व्यक्त करणे होय. मुलाचे भाषा शिक्षण घडत असताना मुलं स्वलिपीकडून स्वलेखनाकडे जात असते. त्यामुळे पहिली, दुसरीच्या मुलांना श्रुतलेखन अचूक यावे हा आग्रह धरणे योग्य आहे काय ?  प्राथमिक स्तरावर  मुलांचे भाषाशिक्षण कशा पद्धतीने घडून येते याचा शास्त्रीय दृष्टीकोन समजून घ्यायला हवा.या अनुषंगाने श्रुतलेखन हवे का स्वलेखन या विषयाचा घेतलेला धांडोळा ....

मुलं शाळेत येण्याअगोदर त्याचे भाषाशिक्षण नैसर्गिक पद्धतीने घडून येत असते. अनौपचारिकपणे ते कुटुंबात,परिसरात भाषा शिकत असते. त्याचे विचार,भावना ते व्यक्त करत असते. साधारणतः तीन-चार वर्षाचे मुलं आपल्या भावना एखादे चित्र काढून, भिंतीवर गिरगटून व्यक्त करत असते.हे त्याचे लेखनच असते.फक्त त्याच्याजवळ लिपी नसते. त्यामुळे ते चित्राच्या माध्यमातून व्यक्त होत असते. ते त्याचे व्यक्त होणे समजून घ्यायला हवे. याच कालावधीत श्रवणाच्या माध्यमातून त्याच्याकडे भाषेतील शब्दांचा संग्रह वाढत असतो. कोणत्या प्रसंगात कसे बोलावे हे मुलं आपसूकच शिकत असते. या कालावधीत मुलांना पुस्तके वाचून दाखवायला हवीत. मुलांसोबत चित्रांवर गप्पा मारायला हव्यात. यामुळे मुलांची वाचन -लेखन पूर्व तयारी होत असते.

मुलं जेव्हा पहिलीच्या वर्गात दाखल होते.तेव्हा मात्र त्याच्या नैसर्गिक भाषा शिकण्यात अडथळे यायला लागतात. त्याला सर्वप्रथम लिपीपरिचय करून देण्याचा व अक्षरांचे अवयव गिरविण्याची घाई केली जाते. काही मुले त्या गतीने शिकतात.काही मागे पडतात. ज्यावेळी मुलं वाचन शिकण्याच्या टप्प्यावर असेल त्यावेळी त्याला शब्दांचे,वाक्यांचे श्रुतलेखन करण्याचा आग्रह करणे योग्य होणार आहे काय ? आपल्या राज्यात साठपेक्षा जास्त बोली बोलल्या जातात. त्या त्या एक परिसराची बोलीभाषाही असते. उदा. महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात बोलल्या जाणाऱ्या परिसर भाषा, मराठवाडी बोली,कोकणी बोली,खानदेशी बोली अशा परिस्थितीमध्ये पहिली, दुसरीच्या, तिसरीच्या माध्यम भाषेत मुलांनी अचूक श्रुतलेखन करावे हा आग्रह धरणे योग्य होणार नाही. कारण इयत्ता तिसरीपर्यंत मुले वाचन शिकण्यासाठी धडपडत असतात. अशा वेळी त्यांना श्रुतलेखन करण्यास सांगावे;परंतु त्यांच्या बोलीतील शब्दांचा स्वीकार करून माध्यम भाषेतील श्रुतलेखनाकडे घेऊन जायला हवे.

खरे तर तिसरीपर्यंतच्या मुलांना श्रुतलेखनपेक्षा स्वलेखन करण्यास प्रेरित करायला हवे;कारण पूर्व प्राथमिक स्तरावर मुलं स्वलिपीतून लेखन करत असते.आता त्याला लिपीपरिचय झाल्यामुळे ते आपले विचार,मत त्या लिपीमधून मांडेल.अशा वेळी त्याने मांडलेले विचार त्याच्या बोलीत असतील तर ते स्विकारायला हवेत.असेच आतापर्यंतच्या अभ्यासक्रमात नमूद करण्यात आलेले आहे.त्यामुळे तिसरीपर्यंत तरी किमान स्वलेखनाला प्राधान्य द्यावे.त्यासोबत हळूहळू श्रुतलेखन घ्यावे.त्यामुळे मुलांची सर्जनशीलता खुडली जाणार नाही.