Thursday, 13 August 2026

विराजला पुस्तकं मिळाली

शालेय पाठ्यपुस्तकांवर मुलांचे खूप प्रेम असते. शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांना पाठ्यपुस्तके मिळाली की मुले खूप खुश होतात. सध्या शिक्षण हक्क कायद्याने सर्व मुलांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. काही शाळेत नवीन प्रवेश वाढल्याने काही मुलांना पाठ्यपुस्तके वेळेत मिळत नाहीत. अशावेळी पाठ्यपुस्तकांचे समायोजन करून अशा मुलांना वेळेत पाठ्यपुस्तके  उपलब्ध करून देणे गरजेचे असते.

 वर्गातील सर्व मुलांकडे पुस्तके आहेत; परंतु माझ्याकडे नाहीत ही भावना मुलांच्या मनामध्ये न्यूनगंड तयार करते. मुलांकडे पुस्तके नसणे हा त्याच्या शिक्षणातील मोठा अडथळा ठरतो. हा अडथळा दूर करणे, शिक्षण व्यवस्थेतील सर्वांचे काम आहे; परंतु काही मुलांना पुस्तके वेळेत मिळत नाही ते वास्तव आहे.

आमच्या शाळेत इयत्ता तिसरीच्या वर्गात इंग्रजी  माध्यमांच्या शाळेतून एक विद्यार्थी आलेला आहे. पुस्तके तर जून महिन्यातच सर्वांना दिली गेली त्यामुळे त्याच्याकडे इयत्ता तिसरीची पुस्तके नव्हती. शाळेतील कोणत्या मुलांना पुस्तके नाहीत याबद्दल मी मुलांना आपुलकीने विचारून ती पुस्तके मी तुम्हाला मिळवून देतो असे आश्वासन दिले होते. त्यामुळे विराज मला येऊन विचारायचा," सर मला पुस्तके कधी देता?" 
मी त्याला "उद्या देतो" म्हणून उत्तर द्यायचं. सकाळी सकाळी शाळेत आलो, माझी गाडी पहिली की तो माझ्याकडे पळत यायचा. केविलवाणा चेहरा करून एकच प्रश्न विचारायचा,"सर, मला पुस्तकं कधी देता?"
मी त्याला तेच उत्तर द्यायचो "उद्या आणतो." 

मी त्याला पुस्तके देऊ शकत नाही याचे मला खूप वाईट वाटायचे. इयत्ता दुसरीची पुस्तके कुठे मिळतील का? याचा मी शोध घेत होतो; परंतु पुस्तके मिळत नव्हती. तालुक्याला शोध घेतला, तिथे पुस्तके नव्हती. मुख्याध्यापकांना, केंद्रप्रमुखांना पुस्तकाबाबत बोलत होतो. सहकारी शिक्षकांना बोलत होतो. आपल्याला इयत्ता तिसरीचा एक संच हवा आहे. 

काल पुन्हा त्याने मला विचारले, "सर मला पुस्तके कधी देता?" मला ओशाळल्यासारखं वाटलं. मला व्यवस्थेचा खूप राग येत होता. व्यवस्थेतल्या प्रशासकीय त्रुटीमुळे विद्यार्थी पुस्तकापासून वंचित राहत आहेत. याचे खूप वाईट वाटत होते. त्यानंतर मी केंद्रप्रमुखांना फोनवर बोललो. मुख्याध्यापकांना बोललो. काहीही करून आपल्याला विराजला पुस्तके द्यायचे आहेत. इतर शाळेत आपण सर्वजण मिळून फोन करूयात. 

दुपारी अचानक मुख्याध्यापकांनी तिसरीचा संच पाठविला. तो संच घेऊन आमच्या शाळेतील संवेदनशील शिक्षक सचिन कांबळे सरांचे मित्र आले होते. सचिन कांबळे सरांनी त्यांच्या मित्राकडून ही पुस्तके मिळवल होती. हा पुस्तकांचा संच पाहून विराज खूप खुश झाला होता. त्याला तो पुस्तकाचा संच दिला. त्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. मलाही आता खूप बरं वाटत होतं. विराज म्हणाला,"सर तुमचा नंबर द्या" 
मी म्हटलं "कशाला....,
तो म्हणाला, "असंच..."
त्याला म्हटलं, "आपण भेटतोच की दररोज...."
त्याला माझ्याबद्दल खूप आपुलकी वाटत होती. शिक्षकाला मुलाचं प्रेम मिळणं, शिक्षकाबद्दल विद्यार्थ्यांना आपुलकी, आत्मीयता वाटणं. हे खूप महत्त्वाचं असतं. त्याच्यासोबत एक फोटो घेतला. आज मला खूप मस्त वाटत होतं.

 आपल्या स्वतःच्या मुलाला पाठ्यपुस्तके नसतील तर काय होईल?  याचा विचार मनात यायला हवा. तर मग आपण धडपड करून पाठ्यपुस्तके मिळून देतोच. बाकी विराजला पाठ्यपुस्तके मिळाल्याचा आनंद खूप वेगळा होता.

Wednesday, 5 August 2026

शालेय आरोग्य तपासणी

"आरोग्य हीच खरी संपत्ती" असे म्हटले जाते. कोणत्याही देशाचा विकास हा तिथल्या नागरिकांच्या, विशेषतः बालकांच्या आरोग्यावर अवलंबून असतो. भारतासारख्या विकसनशील देशात ग्रामीण भागातील मुलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. हेच उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून केंद्र सरकारने 'राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान' (NRHM) अंतर्गत जिल्हा परिषद शाळांमध्ये 'शालेय आरोग्य तपासणी'  हा अत्यंत स्तुत्य उपक्रम सुरू आहे. ग्रामीण भागातील मुलांचे आरोग्य सुदृढ राखण्यासाठी ही योजना एक वरदान ठरत आहे

आज आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राघुचीवाडी या शाळेची शालेय आरोग्य तपासणी संपन्न झाली. यावेळी आरोग्यअधिकारी यांनी प्रत्येक मुलाची आपुलकीने विचारपूस करून आरोग्य तपासणी केली. या मुलांना तपासणी करणाऱ्या डॉक्टर मॅडम अत्यंत प्रेमाने,आपुलकीने प्रश्न विचारून त्यांच्या आरोग्याबद्दल माहिती घेत होत्या. बऱ्याच मुलांचे वजन,उंची कमी असल्याचे दिसून आले. ज्या मुलांना काही आजार आहेत, त्यांना ग्रामीण रुग्णालय धाराशिव येथे पुढील उपचारासाठी जाण्याची शिफारस केली. 

मुलांमध्ये हिमोग्लोबिनची वाढ व्हावी, यासाठी शेंगदाण्याचे लाडू खाणे, सर्व जीवनसत्वे मिळण्यासाठी पोषक आहार घेणे खूप महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी काही पालकांशी संपर्क केला, विद्यार्थ्यांच्या किरकोळ आजाराबाबत पालकांना माहिती दिली. विद्यार्थ्यांना सकस आहार देण्याबाबत मार्गदर्शन केले. 

विद्यार्थ्यांचे शारीरिक आरोग्य चांगले असल्यास तर विद्यार्थ्यांची अभ्यासातील प्रगती चांगली होते. निरोगी शरीरात निरोगी मन वास करीत असते. त्यासाठी शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य निरोगी असायला हवे. आमच्या शाळेत विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे खूप काळजी घेतली जाते. विद्यार्थ्यांना पिण्यासाठी वॉटर फिल्टरचे शुद्ध पाणी दिले जाते.

Monday, 3 August 2026

मैत्री दिन

आपल्या आयुष्यात असेही काही माणसं भेटतात, निरपेक्ष व निस्वार्थ भावनेने आपलं आयुष्य घडविण्याचे कळत नकळत कार्य करत असतात. त्यामुळे आपल्या आयुष्याला आकार येत असतो. अशी माणसं आयुष्यात भेटणं म्हणजे खरी श्रीमंती होय. अशी श्रीमंती अशा मित्रांमुळे वाढत राहते. 

आमचे प्रिय मित्र, मार्गदर्शक श्री. नारायण मुदलवाड यांना काल मैत्री दिनाच्या निमित्ताने मुलांना वाचतं लिहितं करताना हे पुस्तक भेट दिले. त्यांनी काही पुस्तके विकत घेतली. त्यांच्यासोबत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत पाच वर्ष काम केले. या पुस्तकाच्या निर्मितीत त्यांचे खूप सहकार्य लाभले. असे मित्र सोबत असले की जीवनाचा प्रवास आनंददायी होतो.

राघुचीवाडी शाळेत रंगला कौतुक सोहळा

३१ जुलै रोजी आमच्या शाळेतील उपक्रमशील शिक्षिका आदरणीय श्रीमती रुक्मिणी बारकुल यांचा सेवानिवृत्तीच्या निमित्ताने शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर आमच्या शाळेतील प्रयोगशील शिक्षक आमचे मित्र योगेश कपाळे यांची शाळेतून बदली झाल्यामुळे त्यांचा सत्कार करून कृतज्ञतापूर्वक निरोप देण्यात आला. 

श्रीमती रुक्मिणी बारकुल यांनी शाळेला रंगीत प्रिंटर भेट दिला. तर श्री. योगेश कपाळे यांनी शाळेला पाण्याचे जार भेट दिले. दोन्ही शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी समर्पित भावनेने कार्य केले. शाळेच्या विकासात त्या दोघांच्याही खूप मोठे योगदान आहे. 

#डायरी_राघुचीवाडी #शिक्षण #निरोप #जिल्हा_परिषद_शाळा

प्रयोगशील शिक्षकांचे गावकऱ्यांकडून कौतुक

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राघुचीवाडी या शाळेत प्रयोगशील कार्य केलेल्या उपक्रमशील शिक्षिका श्रीमती रुक्मिणी बारकुल या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. तसेच या शाळेतील प्रयोगशील शिक्षक श्री. योगेश कपाळे यांची बदली झाल्यामुळे त्यांना कृतज्ञतापूर्वक निरोप देण्यात येत आहे. या दोघांच्याही सत्काराचा कार्यक्रम  उद्या शाळेत संपन्न होत आहे. त्यानिमित्ताने......

श्रीमती रुक्मिणी बारकुल व श्री. योगेश कपाळे यांनी पदवीधर शिक्षक म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राघुचीवाडी या शाळेत उत्कृष्ट कार्य केले. मुलांना गुणवत्तापुर्ण व दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेत सहशालेय उपक्रमांच्या आयोजन केले. शाळेच्या भौतिक सुविधांमध्ये वाढ व्हावी, शाळा समृद्ध व्हावी यासाठी लोकसहभाग मिळविण्यासाठी प्रयत्न केला. 

श्रीमती रुक्मिणी बारकुल व श्री. योगेश कपाळे यांनी समर्पित वृत्तीने शाळेच्या विकासासाठी सदैव पुढाकार घेतला. श्रीमती रुक्मिणी बारकुल यांनी समाजशास्त्र या विषयाचे अध्यापन करताना विद्यार्थ्यांना सर्जनशील अध्ययन अनुभव दिले. त्यांनी सदैव विद्यार्थ्यांच्या हिताचा ध्यास घेतला होता.

श्री. योगेश कपाळे हे अत्यंत मनमिळावू स्वभावाचे प्रयोगशील शिक्षक आहेत. त्यांचे शाळेच्या विकासात खूप मोठे योगदान आहे. शाळेसाठी समर्पित वतीने काम करत त्यांनी मुलांना घडविण्यासाठी नाविन्यपूर्ण प्रकल्प, उपक्रम राबविले. सहशालेय उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, कला क्रीडा विषयातील विविध उपक्रम त्यांनी शाळेत राबविले. श्री. योगेश कपाळे हे तंत्रस्नेही शिक्षक असून तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांनी विद्यार्थ्यांना अध्ययन अनुभव दिले. शाळा भौतिक सुविधांनी समृद्ध करण्यासाठी पालकांना प्रेरित केले. श्री.योगेश कपाळे हे एक उपक्रमशील शिक्षक, व चांगले मित्र म्हणून मला माझ्या सदैव स्मरणात राहतील. या दोघांनाही त्यांच्या पुढील कार्यासाठी भरभरून शुभेच्छा.