Wednesday, 27 May 2026

पुस्तक भेट

काल माननीय जिल्हाधिकारी पुजार यांची भेट घेतली. त्यांना माझे मुलांना वाचतं लिहितं करताना हे पुस्तक भेट दिले. त्यांनी पुस्तकावर छान चर्चा केली. पुस्तकाचे कौतुक केले. पुस्तक लिहिण्याच्या प्रक्रियेबद्दल विचारले. पुस्तक नक्की वाचतो. वाचून प्रतिक्रिया ही देतो असे म्हणाले. 

त्याचबरोबर मराठी भाषा समितीच्या पुढील शैक्षणिक वर्षातील कामकाजाबाबत चर्चा झाली. धाराशिव जिल्ह्यातील ग्रामीण बोलीतील शब्दांचा शब्दकोश तयार करणे, इयत्ता दहावी च्या विद्यार्थ्यांचा मराठी विषयाचा निकाल वाढविणे, प्रशासकीय व्यवहारात मराठी भाषेचा प्रभावीपणे वापर करणे, मराठी भाषेच्या संवर्धनासाठी विविध उपक्रम घेणे या विषयावर सविस्तर चर्चा झाली. 
माननीय जिल्हाधिकारी यांना मुलांना वाचतं लिहितं करताना हे पुस्तक भेट दिले.

Friday, 9 May 2025

सर्जनशीलतेची रुजवात

 

लेखन म्हणजे मनातील भावना,मत व्यक्त करणे होय. मुलाचे भाषा शिक्षण घडत असताना मुलं स्वलिपीकडून स्वलेखनाकडे जात असते. त्यामुळे पहिली, दुसरीच्या मुलांना श्रुतलेखन अचूक यावे हा आग्रह धरणे योग्य आहे काय ?  प्राथमिक स्तरावर  मुलांचे भाषाशिक्षण कशा पद्धतीने घडून येते याचा शास्त्रीय दृष्टीकोन समजून घ्यायला हवा.या अनुषंगाने श्रुतलेखन हवे का स्वलेखन या विषयाचा घेतलेला धांडोळा ....

मुलं शाळेत येण्याअगोदर त्याचे भाषाशिक्षण नैसर्गिक पद्धतीने घडून येत असते. अनौपचारिकपणे ते कुटुंबात,परिसरात भाषा शिकत असते. त्याचे विचार,भावना ते व्यक्त करत असते. साधारणतः तीन-चार वर्षाचे मुलं आपल्या भावना एखादे चित्र काढून, भिंतीवर गिरगटून व्यक्त करत असते.हे त्याचे लेखनच असते.फक्त त्याच्याजवळ लिपी नसते. त्यामुळे ते चित्राच्या माध्यमातून व्यक्त होत असते. ते त्याचे व्यक्त होणे समजून घ्यायला हवे. याच कालावधीत श्रवणाच्या माध्यमातून त्याच्याकडे भाषेतील शब्दांचा संग्रह वाढत असतो. कोणत्या प्रसंगात कसे बोलावे हे मुलं आपसूकच शिकत असते. या कालावधीत मुलांना पुस्तके वाचून दाखवायला हवीत. मुलांसोबत चित्रांवर गप्पा मारायला हव्यात. यामुळे मुलांची वाचन -लेखन पूर्व तयारी होत असते.

मुलं जेव्हा पहिलीच्या वर्गात दाखल होते.तेव्हा मात्र त्याच्या नैसर्गिक भाषा शिकण्यात अडथळे यायला लागतात. त्याला सर्वप्रथम लिपीपरिचय करून देण्याचा व अक्षरांचे अवयव गिरविण्याची घाई केली जाते. काही मुले त्या गतीने शिकतात.काही मागे पडतात. ज्यावेळी मुलं वाचन शिकण्याच्या टप्प्यावर असेल त्यावेळी त्याला शब्दांचे,वाक्यांचे श्रुतलेखन करण्याचा आग्रह करणे योग्य होणार आहे काय ? आपल्या राज्यात साठपेक्षा जास्त बोली बोलल्या जातात. त्या त्या एक परिसराची बोलीभाषाही असते. उदा. महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात बोलल्या जाणाऱ्या परिसर भाषा, मराठवाडी बोली,कोकणी बोली,खानदेशी बोली अशा परिस्थितीमध्ये पहिली, दुसरीच्या, तिसरीच्या माध्यम भाषेत मुलांनी अचूक श्रुतलेखन करावे हा आग्रह धरणे योग्य होणार नाही. कारण इयत्ता तिसरीपर्यंत मुले वाचन शिकण्यासाठी धडपडत असतात. अशा वेळी त्यांना श्रुतलेखन करण्यास सांगावे;परंतु त्यांच्या बोलीतील शब्दांचा स्वीकार करून माध्यम भाषेतील श्रुतलेखनाकडे घेऊन जायला हवे.

खरे तर तिसरीपर्यंतच्या मुलांना श्रुतलेखनपेक्षा स्वलेखन करण्यास प्रेरित करायला हवे;कारण पूर्व प्राथमिक स्तरावर मुलं स्वलिपीतून लेखन करत असते.आता त्याला लिपीपरिचय झाल्यामुळे ते आपले विचार,मत त्या लिपीमधून मांडेल.अशा वेळी त्याने मांडलेले विचार त्याच्या बोलीत असतील तर ते स्विकारायला हवेत.असेच आतापर्यंतच्या अभ्यासक्रमात नमूद करण्यात आलेले आहे.त्यामुळे तिसरीपर्यंत तरी किमान स्वलेखनाला प्राधान्य द्यावे.त्यासोबत हळूहळू श्रुतलेखन घ्यावे.त्यामुळे मुलांची सर्जनशीलता खुडली जाणार नाही.




 

 

Monday, 13 January 2025

बोरगावला रंगले बाल साहित्य संमेलन

आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरगाव (काळे) या शाळेत सहावे बाल साहित्य संमेलन संपन्न झाले. या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून विद्यार्थी, पालक यांच्याशी संवाद साधला. कवी कट्टाकट्टा, कथा वाचन ही सत्रे उत्तम झाली. सर्व सत्रांचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शाळेतील विद्यार्थ्यांनी केले. मुलांनी छान कविता, कथा सादर केल्या. 

या शाळेत प्रयोगशील शिक्षिका अनिता जावळे यांनी तयार केलेले भाषा दालन पाहायला मिळाले. या भाषा दालनामध्ये विविध साहित्य प्रकारांमध्ये मुलांनी लिहिलेली पुस्तके होती. कथा, कविता, नाटक , जाहिरात, बातमी, संवाद, पक्षांविषयी माहिती अशा विविध साहित्य प्रकारातील पुस्तके विद्यार्थ्यांनी लिहिलेली होती. या पुस्तकांचे मुखपृष्ठ विद्यार्थ्यांनीच तयार केलेले होते. भाषा दालतील ही पुस्तके पाहून मुलांचे खूप कौतुक वाटले.अशा उपक्रमामुळे मुलांच्या भाषिक क्षमतांचा आपसुकच विकास होतो. 

शाळेतील सर्वच शिक्षकांचे खूप कौतुक वाटले. त्यांनी या साहित्य संमेलनाचे खूप छान नियोजन व आयोजन केलेले होते. शाळेचा परिसरही खूप सुंदर होता. वडाचे व पिंपळाचे झाड शाळेच्या सौंदर्यात भर घालत होतं. या दोन्ही झाडांभोवती मुलांना वाचन करण्यासाठी छान कट्टा तयार केलेला होता.

बाल साहित्य संमेलन या उपक्रमामुळे मराठी भाषेचा प्रचार, प्रसार, संवर्धन व अभिवृद्धी होण्यास मदत होते. मुलांच्या भाषिक क्षमतांचा विकास होतो. मुलांच्या अभिव्यक्तीला धुमारे फुटतात. मुलांना समाजभान येतं. मुलं पूरक वाचन करायला लागतात. त्यामुळे बाल साहित्य संमेलनाचे आयोजन करायला हवे.


Thursday, 2 January 2025

बालआनंद मेळावा


विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांचा विकास व्हावा, त्यांना जीवन व्यवहारातील कौशल्य अवगत व्हावी, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास व्हावा यासाठी शाळेत २१ डिसेंबर रोजी शाळेत बालआनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. 

या बालआनंद मेळाव्यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी खाद्यपदार्थांचे,भाजीपाल्यांचे विविध स्टॉल लावले होते. पालकांनी, गावकऱ्यांनी या स्टॉलला भेट देऊन खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला.विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक केले. 

विद्यार्थ्यांनी आपल्या खाद्यपदार्थांची, भाजीपाल्याची जवळपास 14 हजारांची विक्री केली. विक्री करत असताना विद्यार्थ्यांना हिशोबाचे ज्ञान मिळाले. नाणी व नोटा याबद्दल माहिती मिळाली. संवाद कौशल्य विकसित झाले.

अशा उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील अंगभूत गुणांचा विकास होतो. त्यामुळे असे उपक्रम शाळांमध्ये घ्यायला हवेत.
बालआनंद मेळाव्याचे उद्घाटन करताना शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष व सदस्य, मुख्याध्यापक. 

गावकऱ्यांनी बालआनंद मेळाव्याला भेट देऊन खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. आपल्या पाल्यांची कौतुक केले.

आपापल्या शेतातील भाजीपाला विक्रीसाठी विद्यार्थ्यांनी आणला होता. विद्यार्थी भाजीविक्रेते बनले होते.

Tuesday, 3 December 2024

मुलाखत ऐकण्यात रंगली मुले

स्वामी विवेकानंद संस्थेचे अध्यापक विद्यालय धाराशिव येथील छात्राध्यापक अमोल घाटे यांनी आज महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक,श्री. समाधान शिकेतोड यांची मुलाखत घेतली. ही मुलाखत अतिशय प्रेरणादायी झाली. 

मुलाखतीच्या माध्यमातून शिकेतोड सरांनी त्यांचा शैक्षणिक प्रवास मांडला. शाळेत राहिलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. ज्ञानरचनावाद, विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास, सहशालेय उपक्रम, प्रकल्प, ग्रंथालय, वाचनाचे महत्त्व याबाबत त्यांनी सांगितले. 

अध्यापक विद्यालयातील छत्राध्यापक व शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ही मुलाखत प्रेरणादायी ठरली.मुलाखत ऐकताना शाळेतील विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले होते. शाळेतील विद्यार्थ्यांना मुलाखतीचे तंत्र, मुलाखत कशी घ्यावी याबाबत माहिती मिळाली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्ष  श्रीमती रुक्मिणी बारकुल ह्या होत्या. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अध्यापक विद्यालयाचे प्राध्यापक श्री. भिमराव शिंदे  होते. या कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. श्री. योगेश कपाळे यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.