Friday, 9 May 2025

सर्जनशीलतेची रुजवात

 

लेखन म्हणजे मनातील भावना,मत व्यक्त करणे होय. मुलाचे भाषा शिक्षण घडत असताना मुलं स्वलिपीकडून स्वलेखनाकडे जात असते. त्यामुळे पहिली, दुसरीच्या मुलांना श्रुतलेखन अचूक यावे हा आग्रह धरणे योग्य आहे काय ?  प्राथमिक स्तरावर  मुलांचे भाषाशिक्षण कशा पद्धतीने घडून येते याचा शास्त्रीय दृष्टीकोन समजून घ्यायला हवा.या अनुषंगाने श्रुतलेखन हवे का स्वलेखन या विषयाचा घेतलेला धांडोळा ....

मुलं शाळेत येण्याअगोदर त्याचे भाषाशिक्षण नैसर्गिक पद्धतीने घडून येत असते. अनौपचारिकपणे ते कुटुंबात,परिसरात भाषा शिकत असते. त्याचे विचार,भावना ते व्यक्त करत असते. साधारणतः तीन-चार वर्षाचे मुलं आपल्या भावना एखादे चित्र काढून, भिंतीवर गिरगटून व्यक्त करत असते.हे त्याचे लेखनच असते.फक्त त्याच्याजवळ लिपी नसते. त्यामुळे ते चित्राच्या माध्यमातून व्यक्त होत असते. ते त्याचे व्यक्त होणे समजून घ्यायला हवे. याच कालावधीत श्रवणाच्या माध्यमातून त्याच्याकडे भाषेतील शब्दांचा संग्रह वाढत असतो. कोणत्या प्रसंगात कसे बोलावे हे मुलं आपसूकच शिकत असते. या कालावधीत मुलांना पुस्तके वाचून दाखवायला हवीत. मुलांसोबत चित्रांवर गप्पा मारायला हव्यात. यामुळे मुलांची वाचन -लेखन पूर्व तयारी होत असते.

मुलं जेव्हा पहिलीच्या वर्गात दाखल होते.तेव्हा मात्र त्याच्या नैसर्गिक भाषा शिकण्यात अडथळे यायला लागतात. त्याला सर्वप्रथम लिपीपरिचय करून देण्याचा व अक्षरांचे अवयव गिरविण्याची घाई केली जाते. काही मुले त्या गतीने शिकतात.काही मागे पडतात. ज्यावेळी मुलं वाचन शिकण्याच्या टप्प्यावर असेल त्यावेळी त्याला शब्दांचे,वाक्यांचे श्रुतलेखन करण्याचा आग्रह करणे योग्य होणार आहे काय ? आपल्या राज्यात साठपेक्षा जास्त बोली बोलल्या जातात. त्या त्या एक परिसराची बोलीभाषाही असते. उदा. महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात बोलल्या जाणाऱ्या परिसर भाषा, मराठवाडी बोली,कोकणी बोली,खानदेशी बोली अशा परिस्थितीमध्ये पहिली, दुसरीच्या, तिसरीच्या माध्यम भाषेत मुलांनी अचूक श्रुतलेखन करावे हा आग्रह धरणे योग्य होणार नाही. कारण इयत्ता तिसरीपर्यंत मुले वाचन शिकण्यासाठी धडपडत असतात. अशा वेळी त्यांना श्रुतलेखन करण्यास सांगावे;परंतु त्यांच्या बोलीतील शब्दांचा स्वीकार करून माध्यम भाषेतील श्रुतलेखनाकडे घेऊन जायला हवे.

खरे तर तिसरीपर्यंतच्या मुलांना श्रुतलेखनपेक्षा स्वलेखन करण्यास प्रेरित करायला हवे;कारण पूर्व प्राथमिक स्तरावर मुलं स्वलिपीतून लेखन करत असते.आता त्याला लिपीपरिचय झाल्यामुळे ते आपले विचार,मत त्या लिपीमधून मांडेल.अशा वेळी त्याने मांडलेले विचार त्याच्या बोलीत असतील तर ते स्विकारायला हवेत.असेच आतापर्यंतच्या अभ्यासक्रमात नमूद करण्यात आलेले आहे.त्यामुळे तिसरीपर्यंत तरी किमान स्वलेखनाला प्राधान्य द्यावे.त्यासोबत हळूहळू श्रुतलेखन घ्यावे.त्यामुळे मुलांची सर्जनशीलता खुडली जाणार नाही.




 

 

2 comments:

  1. छान मांडणी केली आहे.

    ReplyDelete
  2. अगदी बरोबर सर, या वयातील मुलं वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त होत असतात, फक्त ते आपण समजून घेतलं पाहिजे. स्वलेखन हे त्यातील एक माध्यम आहे..

    ReplyDelete